महाराष्ट्र

बीएसएनएल 4G नेटवर्कद्वारे गावोगावी कनेक्टिव्हिटी, डिजिटल क्रांतीला गती..!

पुणे.

🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘भारत संचार निगम लि. च्या स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कचे उदघाटन (ऑनलाईन)’ कार्यक्रम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विजय शिवतारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारत संचार निगम लिमिटेडच्या स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कचे उदघाटन (ऑनलाईन) संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीएसएनएलच्या 92 हजार 633 टॉवर्सचे उदघाटन होणे ही आनंदाची बाब असून, यात 9020 टॉवर्स महाराष्ट्रातील आहेत. देशातील 24,680 गावांना या टॉवर्सच्या माध्यमातून 4G तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. शतकाच्या सुरुवातीस देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘गोल्डन क्वाड्रिलॅटरल’ प्रकल्प आणि ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ या दोन महत्त्वाच्या योजना सुरू केल्या होत्या. त्यावेळी ते म्हणाले होते जर भारताला विकसित करायचे असेल तर कम्युनिकेशन आणि देशाच्या चारही दिशांना जोडणारे रस्ते हे अत्यावश्यक आहेत. गावागावांना जोडणार रस्ते हे विकासाच्या वाहिन्या आहेत. रस्त्यांमुळे शिक्षण व आरोग्याच्या सुविधा गावापर्यंत पोहोचतात. 6 लाखांहून अधिक गावांना रस्त्यांनी जोडण्याचे काम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी केले.

21व्या शतकात तंत्रज्ञानाचा वेगाने विकास झाला आणि त्यावेळी हे देखील स्पष्ट झाले की केवळ रस्ते महत्त्वाचे नाहीत, तर कनेक्टिव्हिटी तितकीच आवश्यक आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट गावापर्यंत पोहोचल्याशिवाय खरा विकास साधता येणार नाही. याच उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी 4G नेटवर्क पोहोचवण्याचा मोठा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरुवातीला फिनलंड, स्वीडन, चीन आणि दक्षिण कोरिया या मोजक्या देशांकडेच हे तंत्रज्ञान होते. चीन सहकार्य करणार नसल्यामुळे भारताने आत्मनिर्भरतेच्या मार्गाने देशातील सी-डॉट, तेजस नेटवर्क्स लिमिटेड, आयटीआय लिमिटेड, टीसीएस आणि बीएसएनएल अशा संस्थांना एकत्र आणून स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4G प्रणाली विकसित केली आणि या क्षेत्रात भारत जगातील 5वा देश ठरला. भारताने नेहमीच आव्हानांना तोंड देत आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे. भारतीय ज्ञान, तेज आणि कर्मण्यतेच्या बळावर जगाला उत्तर देण्याची आपली क्षमता आज पुन्हा सिद्ध झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, गावात इंटरनेट पोहोचले की गावाला थेट जगाशी जोडता येते. शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग क्षेत्रासाठी कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना हवामानातील बदलांची वेळेवर माहिती मिळून नुकसान टाळता येते. ‘स्मार्ट व्हिलेज’ संकल्पनेद्वारे ग्रामविकास अधिक सक्षमपणे करता येतो. कनेक्टिव्हिटीमुळे व्यवस्थापनात पारदर्शकता व कार्यक्षमता येते. तंत्रज्ञान हे भेदभावरहित माध्यम असल्याने गावोगावी विकास पोहोचविण्यात ते महत्त्वपूर्ण ठरते. नव्या टॉवरमध्ये 5G सुसज्जता आहे. त्यामुळे तंत्रज्ञान निर्मितीत जगाच्या पुढे जाण्याची आपली तयारी स्पष्ट दिसते आणि देश त्याच दिशेने वाटचाल करत आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवा ऑनलाईन तसेच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही, मोबाईलवरूनच सर्व सेवा उपलब्ध होतील. ही व्यवस्था तेव्हाच सक्षम होईल जेव्हा गावोगावी उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. पुढील 2 महिन्यांत सुमारे 90% सेवांचे ‘एंड-टू-एंड डिजिटलायझेशन’ पूर्ण होणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या अर्जाची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळेल. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत असल्याचे यामुळे सिद्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गावोगावी ‘भारतनेट’च्या माध्यमातून फायबर सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्राच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आभार मानले आणि बीएसएनएलचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!